रायगड:-यंदाच्या वर्षी भातपीक चांगले आले असून शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र बदललेले हवामान, परतीचा पाऊस आणि जंगली प्राण्याचा उपद्रव यामुळे भातपिकांवर संक्रांत आली आहे.
त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भापकापणीला सुरुवात केली आहे.
यंदाच्या वर्षी रायगडमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे भाताची पिके चांगली आहेत, मात्र दिवस मावळताना गडगडाटासह हजेरी लावणाऱ्या परतीच्या पावसाने बळीराजाची चिंता वाढवली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती आहे.
नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भात कापणीचे वेध
यंदा खालापुरात २८२२ हेक्टरवर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. समाधानकारक आणि वेळेवर पाऊस झाल्याने भातपीक जोमदार आले आहे. धूळवाफा करून पेरणी केलेल्या भातपिकाच्या लोंबीत उत्तम प्रकारे दाणे तयार झाले आहेत. हळवे भात पीक कापणीसाठी तयार आहे, तर उशिरा लागवड केलेला गरवा अद्याप कापणीसाठी तयार झालेला नाही. परतीच्या पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून खालापूरमध्ये वनवे निंबोडे, माजगाव, तसेच रसायनीत वाशिवली-बोरिवली भागात काही ठिकाणी भातपीक आडवे झाले आहे.
परतीच्या पावसामुळे खोपोली-खालापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर भातपीक आडवे होत आहे. ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता बघता पुढील नुकसान टाळण्यासाठी आहे त्या स्थितीत भातकापणीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे यासाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता भासत आहे.
रासायनिक खतांच्या कमी वापरावर भर
परतीच्या पावसामुळे भातपीक आडवे होत आहे. दरम्यान, उष्णतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे भाताच्या लोंब्यापासून दाणे अलग होत आहेत. दुसरीकडे बदललेल्या वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून आहे त्या स्थितीत कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी पीक उत्तम आले होते, परंतु मागील आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंपरागत शेती कामे करणाऱ्या मजुरांवर भातपिकांची कापणी अवलंबून असते, परंतु स्थानिक स्तरावर शेतमजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, तसेच दुर्गम भागातूनही मजूर पुरेशा संख्येने तालुक्यात येत नसल्याने प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
सुनील निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी, खालापूरपरतीच्या पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी कापणी करावी. कापणी केल्यास पावसापासून संरक्षण होईल, अशा ठिकाणी ठेवावे.दिगंबर गोविंद पवार, शेतकरी, निंबोडेउशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्याला परतीच्या पावसाची एवढी चिंता नाही. परतीच्या पावसात तग धरेल असे पीक सध्या शेतात आहे.