लाभासाठी https://ah.mahabms.com वर 1 जूनपर्यंत अर्ज करावेत
रत्नागिरी: पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालक बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर 1 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.पी. नरुटे यांनी केले आहे. तसेच अँड्राईड मोबाईलधारकांसाठी गुगल प्ले स्टोअर वरुन AH-MAHABMS मोबाईल ॲपसुध्दा उपलब्ध आहे.
नाविन्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी -मेंढी गट वाटप करणे 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनाकरिता निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, एकदिवसीय 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप करणे या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जात आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधा देखीलल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी तालुक्यातील पशुपालक बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत, असे आवहन करण्यात येत आहे. संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1962 यावर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.
ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमादवारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमांतुन ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये पाच वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22 पासुन जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विषयक विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.
यामध्ये शासनाने एखादया योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागु नये, यासाठी शासनाने तयार केलेली प्रतिक्षायादी सन 2021-2022 पासुन पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-२६ लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असुन त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरण किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.