जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन
रत्नागिरी: जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे आयोजन येत्या १० ते १२ मे २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. हा कार्यक्रम स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार येथे दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत रंगणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतीवार यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, प्रक्रियाधारक आणि पशुपालकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन १० मे रोजी सकाळी १० वाजता राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम आणि आमदार किरण (भैय्या) सामंत, सिंधुरत्न समृद्ध योजना समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कृषी विकास परिषदेत आंबा आणि इतर शेतमालाच्या उत्पादकांना थेट ग्राहकांशी संवाद साधता यावा यासाठी स्वतंत्र दालने असणार आहेत. याशिवाय, बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, विविध जातींच्या पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्न विभागांची माहिती देणारी दालने, अत्याधुनिक कृषी यंत्रे व अवजारे यांचे प्रदर्शन आणि कृषी निविष्ठांची दालने हे या सप्ताहाचे खास आकर्षण असेल. खवय्यांसाठी अस्सल रुचकर कोकणी पदार्थांची मेजवानी देखील असणार आहे. एकूण १६५ विविध गटांची दालने या ठिकाणी उभारली जाणार असून, यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी आणि बचत गटांना प्राधान्याने मोफत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दालनांच्या नोंदणीसाठी रोहन चोथे (९८३४४८७१३८) आणि अमोल क्षीरसागर (८१८०८१३५६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच, कृषी विषयांवर विविध परिसंवाद आणि खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, १० मे २०२५ रोजी पौष्टिक तृणधान्ये आणि पारंपरिक पदार्थांच्या पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत केवळ ६० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी ७ मे पर्यंत हर्षला पाटील (९४२२४४१५७१) किंवा गौरी शेरे (८८३०६४८०७७) यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क आहे.
या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताहात कृषी व कृषी संलग्न विविध योजनांची माहिती आणि प्रात्यक्षिके देखील दाखविली जाणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात १० ते १२ मे दरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्राकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतीवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरीत होणार १० ते १२ मे रोजी जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह

Leave a comment
Leave a comment