GRAMIN SEARCH BANNER

जिल्हा नियोजन निधीमधून कृषी विभागाद्वारे भात,नाचणीचे मिळणार मोफत सुधारित बियाणे

Gramin Search
By Gramin Search 4 Views

रत्नागिरी :-  शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खरीप हंगाम 2025 मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भात आणि नाचणीचे सुधारित बियाणे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.  जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेण्यासाठी 30 मे पर्यंत आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा थेट तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांसाठी खर्च करावा लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि पिकांची गुणवत्ताही सुधारेल.

भात पिकासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले रत्नागिरी-०८ हे अधिक उत्पादन देणारे वाण मिळेल. एकूण ६६.०६ टन सुधारित बियाणे वितरण करण्यात येईल. याद्वारे १ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. नाचणी पिकासाठी ‘दापोली-02 व ”दापोली-03 हे सुधारित वाण मोफत दिले जाईल. एकूण ४.३५२ टन सुधारित बियाणे वितरण करण्यात येईल. याद्वारे 870 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. 
बियाणे मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला आपला शेतकरी ओळख क्रमांक, सातबारा आणि आठ-अ, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

Share This Article
Leave a comment