रत्नागिरी:- फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ कि.मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस (टोल फ्री क्र. १४४४७)/ कृषी विभागास तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा काजू पिकाकरीता भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये फळपीक विमा योजनेत आंबा पिकासाठी ३० हजार १३५ शेतकऱ्यांनी व काजू पिकासाठी ६ हजार ३३३ शेतकऱ्यांनी असे एकूण ३६ हजार ४६८ शेतकन्यांनी योजनेत सहभाग घेतलेला आहे. संभावित हवामान धोके, महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग, आर्द्रता इत्यादी माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासन निर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकरी यांना नुकसान भरपाई लागू होते.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण झाले असून वेगाचे वारे २५ कि. मी प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाले असल्यास फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दाखल न केल्यास फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.
विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक असणारी हवामान प्रमाणके- आंबा पीक- वेगाचा वारा – १६ एप्रिल ते १५ मे कालावधीत २५ कि.मी प्रती तास किवा त्यापेक्षा जास्त (नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक) १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मी प्रती तास राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम २० हजार २६ प्रति हेक्टर देय राहील. १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मी प्रती तास पेक्षा जास्त राहिल्यास नुकसानभरपाई रक्कम ३४ हजार रुपये प्रति हेक्टर देय राहील.