मेगाब्लॉकचा मोठा फटका; कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, अनेक गाड्या ३ ते ५ तास उशिराने

saurabhsalvi26
96 Views

रत्नागिरी: मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक आणि कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुंबईकडे येणाऱ्या तसेच कोकण आणि दक्षिण भारताच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या तब्बल तीन ते पाच तास उशिराने धावत असल्याने हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यातच सोमवारपासून म्हणजेच १५ जूनपासून कोकण रेल्वेचे विशेष पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याने प्रवासाचा वेळ आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, रेल्वे प्रशासनासमोर आता गाड्यांचे वेळापत्रक वेळेवर पाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर झालेल्या मेगाब्लॉकचा थेट परिणाम कोकण रेल्वेवरील गाड्यांवर पाहायला मिळाला. पनवेलमार्गे धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या मेगाब्लॉकमुळे नियोजित वेळेपेक्षा बराच उशिराने पोहोचल्या. रविवारी नियमित वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास पनवेल स्थानकात दाखल होणारी मुंबई-गोवा जनशताब्दी एक्स्प्रेस चक्क पहाटे तीनच्या सुमारास पोहोचल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. याशिवाय मंगळूर, करमळी, मडगाव, तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम आणि दक्षिणेकडून ये-जा करणाऱ्या इतर गाड्यांनाही या मेगाब्लॉकचा मोठा विलंब झाला. कोकण रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचल्यावर तिथून पुन्हा सुटेपर्यंत विलंब लागल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कोकण रेल्वे मार्गाचा सुमारे ७४० किलोमीटरचा रोहा ते थोकूर हा मार्ग देशातील महत्त्वाच्या रेल्वेमार्गांपैकी एक असला तरी त्यातील ९० टक्क्यांहून अधिक भाग अजूनही एकेरी आहे. हा बहुतांश भाग एकेरी असल्याने एखाद्या गाडीला विलंब झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण मार्गावरील वाहतुकीवर होतो आणि अनेक ठिकाणी क्रॉसिंगसाठी गाड्यांना थांबावे लागते, ज्यामुळे एका गाडीचा विलंब पुढील अनेक गाड्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, हा विलंब काही काळापुरता असून वेळापत्रक नियमित करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कोकण रेल्वेने १५ जूनपासून अधिकृतपणे पावसाळी वेळापत्रक लागू केले असून ते २० ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या काळात अनेक गाड्यांचा प्रवासकाल वाढविण्यात आला आहे. घाट विभागातील तीव्र उतार, मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि कमी दृश्यमानता लक्षात घेऊन काही ठिकाणी वेगमर्यादा कमी करण्यात आल्या आहेत, परिणामी काही गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्ग हा पावसाळ्यात देशातील सर्वाधिक संवेदनशील रेल्वेमार्गांपैकी एक मानला जातो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात दरवर्षी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याच्या आणि रुळांवर माती-दगड येण्याच्या घटना घडतात. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासन दरवर्षी विशेष पावसाळी वेळापत्रक लागू करते. यंदाही संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त पथके, आपत्कालीन यंत्रणा, भूस्खलन निरीक्षण व्यवस्था आणि नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र, उन्हाळी सुट्टीनंतर आणि पावसाळी पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच गाड्यांचा वाढलेला विलंब अनेकांच्या नियोजनावर परिणाम करत असल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. विशेषतः गोवा आणि कोकणातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांना तसेच कामानिमित्त मुंबईत ये-जा करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. रेल्वे तज्ज्ञांच्या मते, या मार्गाचे टप्प्याटप्प्याने दुपदरीकरण झाल्यास वेळपालनात मोठी सुधारणा होऊ शकते.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *