रत्नागिरी: भातशेती हा कोकणची मुख्य ओळख आणि संस्कृतीचा भाग असताना, गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे या पिकाला मोठा फटका बसला आहे. २०२० ते २०२५ या कालावधीत कोकणातील भात लागवडीखालील क्षेत्र १० ते १२ टक्क्यांनी कमी झाले असून, एकूण तांदूळ उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे. मुसळधार पाऊस, चक्रीवादळांची वाढती वारंवारता आणि मान्सूनच्या बदलत्या चक्रामुळे भातशेतीचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे.
पावसाचे असमान वितरण, जुलै-ऑगस्टमधील पावसाचा खंड आणि ऐन काढणीच्या वेळी परतीचा पाऊस किंवा चक्रीवादळांमुळे भाताचे अपरिमित नुकसान होत आहे. यामुळे पूर्वी प्रति हेक्टर २५ ते २८ क्विंटल मिळणारी उत्पादकता आता थेट १५ ते १८ क्विंटलवर येऊन ठेपली आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत समुद्राचे खारे पाणी शेतात शिरल्यामुळे हजारो हेक्टर जमीन नापीक बनली आहे, तर वाढत्या आर्द्रतेमुळे भात पिकावर करपा आणि लष्करी अळीसारख्या कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या खर्चामुळे आणि उत्पादनातील घसरणीमुळे कोकणातील शेतकरी हवालदिल झाला असून, भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता गंभीर संकटाचा सामना करत आहे.
