कातळशिल्पांच्या संरक्षणाला प्राधान्य देऊनच कोकणातील विकास प्रकल्पांचे नियोजन

Gramin Varta
111 Views

मुंबई: मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील विकास प्रकल्पांचे नियोजन केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. आमदार विठ्ठल लंघे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कातळशिल्पांच्या परिसराचा विकास व पायाभूत सुविधांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती दिली. कोकणातील रत्नागिरी विभागातील ३०० कि.मी. लांब व २५ कि.मी. रुंद क्षेत्रात २००० पेक्षा जास्त कातळशिल्पे व १५० हून अधिक कातळशिल्प स्थळे असून, या अमूल्य वारशाचा इतिहास समजून घेण्यासाठी सर्व ऋतूंमध्ये त्यांचे दृकश्राव्य चित्रीकरण करणे गरजेचे असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.

या अनुषंगाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ८ एप्रिल २०२६ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यासाठी १४.५० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली असून, हा निधी आता उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पांतर्गत एआयच्या माध्यमातून तत्कालीन जीवनशैलीचे दृश्य पुनर्निर्मिती करणारा ४५ मिनिटांचा उच्च दर्जाचा सिनेमॅटिक माहितीपट, युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन यादीतील नऊ स्थळांवर आधारित आठ मिनिटांचे स्वतंत्र लघु माहितीपट आणि संपूर्ण चित्रीकरण प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करणारा एक ‘बिहाईंड द सीन्स’ माहितीपट तयार करण्यात येणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *