रत्नागिरी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील कार्यक्रमासाठी आलेल्या पुण्यातील ५९ वर्षीय महिलेचा आजारपणामुळे आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिता गोपीनाथ मडके (वय ५९, रा. पिंपळे गुरव, जि. पुणे, सध्या मुक्काम पाली, ता.जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
१० जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता अनिता मडके या सत्संग समूहाच्या इतर महिला व पुरुषांसह गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज येथील संस्थेमध्ये उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान त्यांना उलट्या, मळमळ, जुलाब यांसारखी लक्षणे दिसून आली. त्यानंतर अशक्तपणा जाणवल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यावेळी उपस्थित असलेल्या प्रकाश बाळकृष्ण मोरे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पाली येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सकाळी १०.१५ वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
रत्नागिरी गुरुपौर्णिमेसाठी पुण्यातून आलेल्या महिलेचा मृत्यू






