जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे चावलखेडे येथील अंजनी नदीला अचानक महापूर आल्याची भीषण घटना घडली असून, नदीपात्रात मासे पकडत असलेला सुरेश छगन अहिरे हा तरुण पुराच्या पात्रात अडकला होता. मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अंजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरणातून ५ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता, ज्यामुळे नदीत अचानक पूरस्थिती निर्माण झाली.
प्रशासनाकडून नदीकाठी न जाण्याचे आवाहन लगातार केले जात असतानाही, नियमित मासेमारी करणाऱ्या सुरेश अहिरे यांना वाढत्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पुराच्या पाण्यात अडकले. जिवाचा धोका निर्माण झाल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत नदीतील एका झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला आणि गेल्या पाच तासांपासून ते त्याच झाडावर अडकून राहिले होते. पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी यामुळे सुरुवातीला स्थानिक नागरिकांना व प्रशासनाला बचावकार्यात मोठे अडथळे आले, त्यातच अंधार पडल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आणि झाडावर अडकलेल्या तरुणाशी संपर्क करणेही अशक्य झाले होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या तरुणाच्या बचावासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याचे ठरवले होते आणि अखेर पोलिसांच्या पथकाने अत्यंत धाडसाने व शर्थीचे प्रयत्न करत पुराच्या पात्रातून सुरेश अहिरे या तरुणाला सुखरूप बाहेर काढले आहे.






