रत्नागिरी: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे व त्रासामुळे ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आणि दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत युनियन अधिकारी संघटनेच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. १८ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा कामकाजावर बहिष्कार टाकला असून, मंगळवारी सकाळच्या सुमारास जिल्ह्यातील तब्बल ५६७ ग्रामपंचायत अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. युनियनचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र महाडिक आणि जिल्हा सरचिटणीस संजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद कार्यालयातून निघालेला हा विराट मूक मोर्चा जयस्तंभ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्च्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. शिवरे येथील घटनेतील दोषींवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून हा संपूर्ण खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी आग्रही मागणी अधिकाऱ्यांनी लावून धरली आहे. यासोबतच वर्षभरात वारंवार होणाऱ्या १० ते १२ ग्रामसभांऐवजी कायद्यात तातडीने आवश्यक दुरुस्ती करावी आणि वर्षातून केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा ठेवण्याची कायदेशीर तरतूद करण्यात यावी, असा महत्त्वाचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला.
ग्रामसभेत त्रयस्थ व्यक्तींकडून होणाऱ्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणावर आणि त्याद्वारे होणाऱ्या बदनामीवर कायदेशीर बंदी घालून कडक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय संवेदनशील, वादग्रस्त व मोठ्या ग्रामसभांसाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त पुरवावा तसेच महसूल, कृषी, आरोग्य, समाजकल्याण यांसारख्या इतर विभागांच्या विशेष ग्रामसभांची प्रशासकीय व आयोजनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागांवरच सोपवण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात स्पष्ट उल्लेख करून अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.






