एक्सप्रेस गाड्यांना थांब्यासह विविध मागण्यांसाठी मुंबईकर व ग्रामस्थ एकवटले
लांजा/अरबाज नेवरेकर: विलवडे रेल्वे स्थानकावर विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासह प्रवाशांच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण’ यांच्या वतीने २० सप्टेंबर रोजी स्थानकावर जोरदार लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
विलवडे स्थानकावर जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मांडवी व कोचीवेली या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, दुसऱ्या फलाटाची निर्मिती करून पादचारी पूल (ओव्हरब्रिज) बांधण्यात यावा, तसेच कोकणकन्या, दिवा पॅसेंजर व तुतारी एक्सप्रेससाठी आरक्षण कोटा मंजूर करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिव्यांगांसाठी लिफ्टची सोय, प्रा. मधु दंडवते यांचे तैलचित्र उभारण्यास परवानगी आणि खेड ते सावंतवाडी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
या आंदोलनासाठी लांजा पूर्व भाग व राजापूर तालुक्यातील गावे एकत्र आली असून मुंबईकर आणि स्थानिकांच्या एकजुटीने जागोजागी पोस्टर्स लावून तयारी सुरू आहे. उपोषणाला ५०० हून अधिक नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज असून, कायदा व सुव्यवस्था राखून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पार पाडले जाईल. रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी नागरिकांनी या उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
विलवडे रेल्वे स्थानकावर २० सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण; प्रवासी संघटनेची जय्यत तयारी
Leave a Comment



