दिल्ली: राज्यसभेने बुधवारी ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक 2026’ मंजूर केले. या दुरुस्तीमुळे ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.
या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय गीताचा जाणूनबुजून अपमान करणे किंवा त्याच्या गायनात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरणार असून, दोषी आढळल्यास कमाल 3 वर्षांचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, हा बदल केवळ कायद्यातील दुरुस्ती नसून भारताची राष्ट्रीय चेतना, सांस्कृतिक परंपरा, स्वातंत्र्यलढ्याचे आदर्श आणि देशाच्या आत्म्याप्रती असलेली सामूहिक बांधिलकी अधोरेखित करणारा आहे.या दुरुस्तीमुळे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध अधिनियम, 1971 चा विस्तार करण्यात आला आहे. यापूर्वी या कायद्यांतर्गत राष्ट्रीय ध्वज, भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यांना कायदेशीर संरक्षण होते. आता त्यात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचाही समावेश करण्यात आला आहे.
विधेयकानुसार, ‘वंदे मातरम्’च्या गायनात जाणूनबुजून अडथळा आणणे, त्याचे गायन थांबवणे किंवा त्याचा अपमान करणे हे सर्व कायद्याअंतर्गत गुन्हे मानले जातील.
गोंधळात विधेयक मंजूर
हे विधेयक विरोधकांच्या गदारोळात मंजूर करण्यात आले. दुपारच्या सत्रात राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी दिल्लीतील नीट पेपर लीक प्रकरणातील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी करत घोषणाबाजी केली.उपसभापती हरिवंश यांनी सदस्यांना सभागृहाची मर्यादा आणि शिस्त राखण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ सुरूच राहिल्याने सूचीबद्ध कामकाज सुरू ठेवण्यात आले आणि विधेयकावरील चर्चा पार पडली. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले बोलत असताना विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
सरकारच्या मते, या दुरुस्तीचा उद्देश राष्ट्रीय ध्वज, राज्यघटना आणि राष्ट्रगीताप्रमाणेच राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’लाही समान कायदेशीर संरक्षण प्रदान करणे हा आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी या कायद्यात कमाल तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम्’ची रचना केली होती. नंतर हे गीत त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यात या गीताने राष्ट्रीय चेतना जागविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि पुढे त्याला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता देण्यात आली.
दरम्यान, या दुरुस्तीनंतर ‘अपमान’ आणि ‘अडथळा’ या संज्ञांची कायदेशीर व्याख्या काय असेल, तसेच जाणूनबुजून अडथळा निर्माण करणे आणि एखाद्या व्यक्तीने राष्ट्रीय गीताच्या गायनात सहभागी न होणे यामधील स्पष्ट फरक कसा केला जाईल, याबाबतही चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा
Leave a Comment






