दापोली: दापोली तालुक्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवनावर परिणाम केला असून, पहिल्याच पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील चंद्रनगर येथील हॉटेल ‘पायसदान’चे मोठे नुकसान झाले आहे. हॉटेलचे मालक रमेश भुवड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे साठ फूट लांबीची पक्की चिरेबंदी संरक्षक भिंत पावसाच्या पाण्याच्या दाबामुळे आज सकाळी अचानक कोसळली. मुख्य रस्त्यालगत असलेल्या या भिंतीच्या कोसळण्यामुळे भुवड यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भिंत कोसळल्यामुळे हा परिसर धोकादायक बनला आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, दुर्घटना टाळण्यासाठी भुवड यांनी स्वतः खबरदारी म्हणून रस्त्याच्या बाजूला चिरे लावून अडथळा निर्माण केला आहे. या घटनेची माहिती चंद्रनगरचे प्रशासक सकपाळ यांना देण्यात आली असून, प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
