रत्नागिरी: कोकणच्या प्राचीन मानवी अस्तित्वाची आणि समृद्ध संस्कृतीची साक्ष देणारी कातळशिल्पे आता थेट शालेय शिक्षणाचा भाग बनली आहेत. इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात या कातळशिल्पांची माहिती समाविष्ट करण्यात आली असून, यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अद्वितीय सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्याची आणि त्याचे महत्त्व समजून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या कातळशिल्पांमुळे नव्या पिढीमध्ये वारसा जतनाची जाणीव आणि संशोधनाची प्रेरणा अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत आढळलेली ही हजारो वर्षे जुनी कातळशिल्पे निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ऋत्विज आपटे आणि त्यांच्या संशोधक सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जगासमोर आली. यामध्ये विविध प्राणी, मानवी आकृती, भौमितिक रचना आणि दिशादर्शक खुणांच्या माध्यमातून प्राचीन मानवाच्या जीवनशैलीचा आणि श्रद्धांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात आला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रूंढेतळी, देवाचेगोठणे, बारसू, देवीहसोळ, जांभरूण, कुडोपी आणि उक्षी या आठ महत्त्वपूर्ण स्थळांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ संशोधनासाठी आणि जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, शालेय अभ्यासक्रमातील हा समावेश म्हणजे संशोधनाच्या दीर्घ प्रवासाला मिळालेली मोठी पोचपावती असल्याचे म्हटले आहे. कातळावर कोरलेल्या या आदिम रेषा केवळ पुस्तकाच्या पानांपुरत्या मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनात कोरल्या जाव्यात, जेणेकरून भविष्यात आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणारे सजग नागरिक आणि संशोधक घडतील, अशी भावना संशोधकांनी व्यक्त केली आहे. इतिहासाच्या पुस्तकातील या समावेशामुळे आता कोकणचा हा सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीच्या ज्ञानप्रवासाचा अविभाज्य घटक बनला आहे.
