मुंबई : गेल्या काही वर्षात अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, २०२४ या वर्षात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने (एनसीबी) महाराष्ट्रात ५५ हजार ३५१ किलो गांजा जप्त केला.
एनबीसीचा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यात ही माहिती नमूद केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गांजा, कोकेनसह सिंथेटिक अमलीपदार्थाच्या तस्करीत विक्रमी वाढ झाली आहे. २०२४ या वर्षात देशात ११ हजार ९९४ किलो सिंथेटिक अमलीपदार्थ पकडण्यात आला आहे. २०१९ मध्ये देशात १८९० किलो सिंथेटिक अंमली पदार्थ पकडला होता. त्या तुलनेत गेल्यावर्षी यामध्ये तब्बल ६ पट वाढ झाली आहे. २०१९ नंतर अंमली पदार्थाच्या प्रामुख्याने तस्करीमध्ये वाढ होताना दिसत असून डार्क वेब, कुरियरच्या माध्यमातून तस्करी होत आहे. याचे व्यवहार बिटकॉईन्स, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होत असल्याचे एनसीबीच्या तपासात आढळले आहे.
का वाढतेय तस्करी ?
भारताच्या एका बाजूला अफगाणिस्तान, पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला म्यानमार, थायलंड हे देश अमलीपदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतात. त्यांना भारतासह इतर देशांत अमलीपदार्थ पाठविण्यासाठी भारत हा सोयीचा देश वाटतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. राजस्थान, पंजाब येथे पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर हेरॉईनची तस्करी होते.
१,२२,२२४ जणांना अटक
अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणांत एनसीबीने राज्यात एकूण १४ हजार ५५३ गुन्हे दाखल करत एकूण १४ हजार १३५ लोकांना अटक करण्यात आली आहे. तर देशभरात एकूण ९६ हजार ९३० गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये १ लाख २२ हजार २२४ लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ६६० परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
सिंथेटिक म्हणजे काय?
सिंथेटिक ड्रग्ज हे नशा चढण्याच्या उद्देशाने रसायनांचे मिश्रण करून प्रयोगशाळेत तयार केले जाते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कारखाना उभारून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची निर्मिती करून वितरण केले जाते.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; ‘एनसीबी’चा अहवाल
