रत्नागिरी :- गजबजलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या राम आळीत आज रविवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. जनता बँकेच्या एटीएमसमोर रक्तबंबाळ अवस्थेत बसलेल्या तरुणावर सुरक्षा रक्षकानेच अचानक हल्ला केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एटीएमसमोर बसलेला तरुण गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसत असतानाही त्याला मदत करण्याऐवजी सुरक्षा रक्षकाने त्याला तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाने हालचाल न केल्याने संतप्त झालेल्या रक्षकाने लाकडी काठीने थेट त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यामुळे तरुण जागीच कोसळला असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
भरदिवसा, वर्दळीच्या परिसरात असा हिंसक प्रकार घडल्याने उपस्थित नागरिक स्तब्ध झाले. काही वेळातच परिसरात गर्दी जमली.
नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सुरक्षा रक्षकाकडूनच झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








