केळवली-निखरे मार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य
राजापूर: राजापूर रोड रेल्वे स्टेशनपासून पुढे केळवली, निखरे मार्गे कोल्हापूर रोड तसेच मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा अत्यंत वर्दळीचा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. रस्त्याची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, या मार्गाला ‘अखेरच्या घटका मोजणारा रस्ता’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
कराड, सातारा, पुणे, मुंबई, तसेच सिंधुदुर्ग, गोवा या भागातून येणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, सध्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे एक आव्हान बनले आहे. हे खड्डे इतके खोल आहेत की, वाहने आदळून त्यांचे मोठे नुकसान होत आहे.
विशेषतः पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा पत्ता लागतोय की नाही, अशी शंका घेण्याजोगी स्थिती आहे. त्यामुळे, लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.





