राजापूर/प्रशांत पवार: राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे सुरू असलेला भूमिगत केबल प्रकल्प नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या प्रकल्पाच्या कामाचा निकृष्ट दर्जा, तसेच महावितरण अधिकाऱ्यांकडून होत असलेले अपुरे सुपरव्हिजन यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यालगत खोदकाम करून खड्डे तसेच उघडेच ठेवण्यात आले आहेत. परिणामी नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः जैतापूर रस्त्यालगत दोन आठवड्यांपासून मोठा खड्डा उघडाच ठेवण्यात आला आहे. या परिसरात शाळा तसेच वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. भूमिगत केबल टाकण्याच्या कामासाठी एचडीडी (Horizontal Directional Drilling) पद्धतीचा वापर अपेक्षित असताना, ग्रामपंचायत हद्दीत जेसीबीद्वारे सर्रास खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
या परिस्थितीचा फटका शाळकरी मुले व रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय जैतापूर पुलावर टाकण्यात आलेल्या केबल्स व्यवस्थित न बसवता तसेच सोडून दिल्याने पर्यटक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत ग्रामपंचायत सरपंचांशी संपर्क साधला असता संबंधित विभागाशी बोलून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच ठेकेदारांकडूनही काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाची गती आणि दर्जा सुधारतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जैतापूरमध्ये भूमिगत केबल कामाचा गोंधळ; खड्डे, धूळ आणि निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त






