GRAMIN SEARCH BANNER

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ई-पीक पाहणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Gramin Varta
95 Views

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.खरीप हंगाम २०२५ साठी आवश्यक असलेल्या ई- पीक पाहणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण लागवडी योग्य क्षेत्र १.६९ कोटी हेक्टरपैकी ८१.०४ लाख हेक्टर म्हणजेच ४७.८९ टक्के क्षेत्रावरील पिकांची ई- पीक पाहणीद्वारे नोंद झाली आहे.

१४ सप्टेंबरपर्यंत किमान ६० टक्के क्षेत्रावरील शेतकरी स्तरावरील पिकांची नोंद होण्याची अपेक्षा राज्य शासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. पण सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्येने शेतकऱ्यांना पीक नोंदणी करताना अडचणी येत आहेत. यामुळे ई-पीक पाहणीचे प्रमाण कमी राहिले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागांत झालेली अतिवृष्टी, पूर आदींमुळे क्षेत्रीय कार्यालयाकडून केलेल्या मागणीनुसार शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, सदर मुदत पुन्हा वाढवण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्याकडून विनंती करण्यात आली होती. याबाबत १८ सप्टेंबर रोजी मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक झाली. त्यात शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ई पीक पाहणी (Digital Crop Survey) अ‍ॅपद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक (AgriStack योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी साहाय्यक यांची नियुक्ती केली आहे. राज्यामध्ये एकूण ४९,३६६ साहाय्यक यांची नोंद झालेली आहे. सर्व पीक पाहणी साहाय्यकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. पीक पाहणी साहाय्यकामार्फत प्रत्येक गावातील १०० टक्के ओनर्स प्लॉटची पीक पाहणी करून घेण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांची आहे. त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Total Visitor Counter

3199514
Share This Article