रत्नागिरी : शहरालगतच्या भाटये सुरुबन परिसरात तरुणाचा मोबाईल चोरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अमान इमान हुसेन मुल्ला (२४) आणि अर्शद राशिद खान (२५) अशी निर्दोष मुक्तता झालेल्या संशयितांची नावे आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी इंझमाम अस्लम काझी (२१) हा ३ फेब्रुवारी २०२५ रोजी भाटये सुरुबन येथे फिरण्यासाठी गेला असता दुपारच्या सुमारास त्याच्या बॅगमधील मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर इंझमाम याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आधारे अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिस तपासादरम्यान अमान मुल्ला आणि अर्शद खान यांनी मोबाईल चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. मात्र सुनावणीदरम्यान आरोप सिद्ध होण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे सादर न झाल्याने न्यायालयाने दोघांचीही निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. सुहेल शेख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
रत्नागिरी भाटये सुरुबन मोबाईल चोरी प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता





