GRAMIN SEARCH BANNER

‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीची दखल; उक्षी वांद्री परिसरातील जिओ नेटवर्क अखेर सुरळीत

Gramin Varta
4 Views

रत्नागिरी:  तालुक्यातील उक्षी वांद्री परिसरातील जिओ नेटवर्क गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाले होते, ज्याची दखल ‘ग्रामीण वार्ता’ने घेतल्यानंतर कंपनी स्तरावर वेगाने हालचाली झाल्या आहेत. या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीचा मोठा परिणाम झाला असून, संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येचे निराकरण केले आहे. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प असलेली इंटरनेट आणि फोन सेवा आता पूर्ववत झाली असून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

उक्षी वांद्री परिसरात गेल्या चार दिवसांपासून जिओच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला होता. इंटरनेट चालत नसल्याने ऑनलाइन कामे रखडली होती, तर ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नोकरदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. फोन कॉल्समध्ये वारंवार येणारा व्यत्यय आणि ५जी च्या युगात साधी २जी सेवाही उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. वारंवार तक्रार करूनही कंपनीचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते, मात्र ‘ग्रामीण वार्ता’ने या जनसामान्यांच्या समस्येला वाचा फोडताच जिओ प्रशासनाला जाग आली. बातमी प्रसिद्ध होताच वरिष्ठ स्तरावरून हालचाली करत तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला.

या यशस्वी पाठपुराव्यामुळे आता उक्षी वांद्री परिसरातील सर्व ऑनलाइन व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि नोकरदारांची अडकलेली कामे मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या माध्यमातून ‘ग्रामीण वार्ता’ने ग्रामस्थांचा आवाज लावून धरला आणि कंपनीला तात्काळ सेवा सुधारण्यास भाग पाडले. नेटवर्क सुरळीत न झाल्यास आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या ग्रामस्थांनी आता या सकारात्मक बदलाचे स्वागत केले असून, जनहितार्थ दिलेल्या या ‘दणक्या’बद्दल ‘ग्रामीण वार्ता’चे सर्वत्र आभार मानले जात आहेत.

Total Visitor Counter

3369871
Share This Article