GRAMIN SEARCH BANNER

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री वैष्णव

Gramin Varta
4 Views

दिल्ली: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्‍या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी या 108 कि.मी. लांबीच्या नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अखेर तयार झाला आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही महत्त्वाची माहिती दिली.

हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकणातील मालवाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट आणि कमी वेळेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सामाजिक आणि आर्थिक निकषांवर आधारित या प्रकल्पाला गती देण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. डीपीआर तयार झाल्यानंतर या प्रकल्पासाठी राज्य सरकारांसह विविध भागधारकांकडून सल्ला आवश्यक असून, सोबतच नीती आयोगाकडून आणि केंद्रीय अर्थ मंत्रालय इत्यादीकडून मूल्यांकनासारख्या आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतील. प्रकल्प मंजुरी ही सतत चालणारी आणि विविधांगी प्रक्रिया असल्यामुळे, विविध भागधारकांकडून होणारी मूल्यांकने आणि परवानग्या यावर प्रकल्प पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा अवलंबून असेल.

सद्यस्थितीला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस एससीएसएम (टी) कोल्हापूर या स्थानकाला 30 रेल्वेगाड्यांची सेवा पुरवली जात असून, त्यांच्या मदतीने कोल्हापूरला मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली आणि अहमदाबाद यासारख्या प्रमुख ठिकाणांशी जोडण्यात आले आहे. हा रेल्वे मार्ग 108 कि.मी. लांबीचा असून, यामुळे कोल्हापूर आणि कोकण रेल्वे मार्ग थेट जोडला जाणार आहे. या सर्व तांत्रिक बाबींवर वेगाने काम सुरू असल्याचेही लोकसभेत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3209257
Share This Article