लांजा / सिकंदर फरास: तालुक्यातील धुंदरे परिसरात शनिवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने मोठी दाणादाण उडवली. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.तर धुंदरे येथील एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दोन गुरे दगावली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुंदरे येथील ग्रामस्थ सूर्याजी बाणे यांच्या घराशेजारील गोठ्यापासून काही अंतरावरच सायंकाळच्या सुमारास प्रचंड वेगाने वीज कोसळली. आणि काही वेळातच गोठ्यात बांधलेली दोन गुरे जागीच मृत्युमुखी पडली. बाणे यांचे दुभती जनावरे दगावल्याने त्यांचे मोठे पशुधन नुकसान झाले आहे.
स्थानिकांनी सांगितले की, त्या परिसरात वीज कोसळल्याचे जाणवले. वीज दिसून आली नाही. मात्र 2 गुरे दगावल्याचे दिसत आहे. ही गुरे नेमकी वीज पडून गेली की अन्य कोणत्या कारणाने गेली याची स्पष्टता अद्याप झालेली नाही. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. उद्या पंचनामा झाल्यानंतर याबाबत सारे स्पष्ट होईल असे येथील ग्रामस्थानी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शाखा प्रमुख रितेश गुरव आणि पोलीस पाटील विकास करंबळे यांनी तातडीने सूर्याजी बाणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. सध्या प्रशासकीय स्तरावर या घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने सरकारी मदत मिळावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.






