गुहागर: पावसात भिजणाऱ्या घनदाट जंगलात जीव धोक्यात घालून महावितरणच्या जनमित्रांनी उच्च दाबाच्या वीजवाहिनीतील बिघाड शोधून काढला आणि दुरुस्ती केली. २७ जूनच्या रात्री अचानक लोटे परिसरातील ३३ के.व्ही. वीजवाहिनी बंद पडल्याने या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. फॉल्ट नेमका कुठे आहे, हे समजण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच्या अंधारात दुर्गम जंगलात धाव घेतली. सुरुवातीच्या तपासणीत यश न मिळाल्याने, कर्मचाऱ्यांनी तब्बल २५ विजेच्या खांबांवर चढून प्रत्येक ‘पिन’ची कसून तपासणी केली. पावसाचा जोर आणि जंगलातील धोका असतानाही कर्मचाऱ्यांनी ही मोहीम थांबवली नाही. अखेर रात्री २ वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड शोधून तो दूर करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेमुळेच गुहागरमधील वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे महावितरणच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोणतीही पर्वा न करता अवघड प्रसंगी तत्पर सेवा देणाऱ्या या जनमित्रांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
