मुंबई : चेंबूर परिसरात मंगळवारी घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेत ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अन्य चार मुले जखमी झाली आहेत. चेंबूरमधील रस्ता क्रमांक ११ वर दुपारी ही घटना घडली, जेव्हा युनिव्हर्सल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घेऊन घरी परतत होती. अचानक बसवर एक मोठे झाड कोसळल्याने झालेल्या या अपघातात विहानचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि बस कंडक्टरने तातडीने धाव घेत बसमधील इतर मुलांना सुखरूप बाहेर काढले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेनंतर विहानच्या आईचा झालेला आक्रोश पाहून उपस्थित लोकांची मने हेलावून गेली. विहानचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न होते आणि शाळेतून आल्यानंतर तो रोज खेळायला जायचा. मात्र, तो आता परतणार नाही हे वास्तव स्वीकारणे त्याच्या आईला अशक्य झाले आहे. विहानची क्रिकेटची बॅट छातीशी कवटाळून ती सुन्न होऊन बसली होती आणि ‘विहानला खेळायला जायचे आहे’ असे एकच वाक्य ती वारंवार उच्चारत होती. तिच्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, विहान हा अत्यंत हुशार आणि संस्कारी मुलगा होता, ज्याच्यावर तिचे संपूर्ण आयुष्य अवलंबून होते.
घटनेनंतर जखमी झालेल्या पाच विद्यार्थ्यांना तातडीने झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी विहानला मृत घोषित केले, तर इतर चार मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, निष्पाप मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळी वातावरणात धोकादायक झाडांची छाटणी न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
