चिपळूण : मौजे मिरजोळी कोलेखाजन (ता. चिपळूण) येथील शेतकरी प्रमोद कुंडलिक कदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या ५ दुधाळ म्हशींना महावितरणच्या विद्युत वाहिनीतून झालेल्या अवैध प्रवाहाच्या धक्याने मृत्यू आला असून, एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या प्रकारावर आमदार शेखर निकम यांनी विधानभवनात आवाज उठवत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या पंचनाम्यानुसार, या पाच जनावरांची एकूण बाजारभावानुसार किंमत रु. ५ लाख २५ हजार इतकी आहे. मात्र महावितरणकडून केवळ ३० हजार रुपये प्रति जनावर या दराने एकूण १ लाख ८० हजार रुपयांचीच भरपाई दिली जाणार आहे. परिणामी, शेतकरी कदम यांच्यावर सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान थेट येणार आहे.
आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधत म्हटले की, “ही घटना केवळ एक अपघात नाही, तर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडलेली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत नुकसानभरपाईची रक्कम ही शासकीय अनुदानाच्या निकषांनुसार नव्हे, तर वस्तुनिष्ठ नुकसानाच्या आधारावर ठरवली पाहिजे.”
निकम यांनी शासनाला मागणी करताना स्पष्ट केलं की, महावितरणने अशा घटनांत उत्तरदायित्व स्वीकारणं आवश्यक आहे आणि भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. तसेच, या प्रकरणात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ भरपाई मिळावी, अशी विनंती त्यांनी केली.
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप असून, महावितरणच्या ढिसाळपणाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दुधाळ जनावरांचा दवडलेला जीव म्हणजे शेतकऱ्याच्या उपजीविकेचा पाया हादरणं, आणि याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.
चिपळुणात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याच्या ५ म्हशी दगावल्या; आमदार शेखर निकम यांची अधिवेशनात मुख्यमंत्री निधीतून भरपाईची मागणी






