मुख्यमंत्री यांचा वाढदिवस व दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ‘महा आरोग्य शिबिर’

Gramin Varta
35 Views

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘महा आरोग्य शिबिर’ ओयोजित करण्यात आले आहे.

या अभियानाची सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये तसेच शासकीय दंत, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांनी अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या अभियानाचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती करून शिबिरे यशस्वी करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

मंत्रालयात राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांच्या आयोजित बैठकीत त्यांनी या अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेत विविध सूचना दिल्या. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी तसेच राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व होमिओपॅथी महाविद्यालयांचे अधिष्टाता यावेळी व्हीसीव्दारे उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ म्हणाले की, प्रत्येक महाविद्यालयाने विभागनिहाय समित्या स्थापन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. समित्यांची यादी तातडीने संचालनालयाकडे पाठवावी. वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये, यूएचटीसी आणि आरएचटीसी येथे शिबिरासाठी योग्य ठिकाण निश्चित करून आवश्यक सर्व पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी. शिबिरांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक संस्थेमध्ये स्वतंत्र प्रसार व जनजागृती समिती स्थापन करून फ्लेक्स, पोस्टर्स, सार्वजनिक ध्वनीप्रणाली, समाजमाध्यमे तसेच इतर माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक शिबिरासाठी स्वतंत्र माहिती व नोंदणी कक्ष सुरू करावा, असेही त्यांनी सांगितले.

शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर, इंटर्न, परिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक तसेच अन्य आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी रांग व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची सुविधा, अल्पोपहार, पार्किंग तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिष्ठात्यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

स्वयंसेवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अभियान अधिक लोकाभिमुख करावे. प्रत्येक शिबिरस्थळी आपत्कालीन वैद्यकीय सेवा आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध ठेवावीत. रक्तदान शिबिरांसाठी शासकीय व धर्मादाय रक्तपेढ्या तसेच रक्तदान क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधावा. जनसहभाग वाढविण्यासाठी मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारे तसेच अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

वैद्यकीय तपासणीत संशयित अथवा बाधित आढळलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र नोंदणी करून त्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित रुग्णालयात तातडीने संदर्भित करण्यात यावे. प्रत्येक अधिष्ठात्यांनी दररोज शिबिराचा आढावा घ्यावा, दैनंदिन अहवाल संचालनालयाकडे पाठवावा तसेच छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरणासह विहित कालावधीत संपूर्ण अहवाल सादर करावा, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम

२२ ते २८ जुलै या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई (जेजे,जी.टी), पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, बारामती, नांदेड, अकोला, जळगाव, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर,नागपूर इ.गा.शासकीय, गोंदिया, आंबाजोगाई, लातुर,सातारा, अलिबाग, नाशिक या महाविद्यालयांमध्ये २२ ते २४ जुलै या कालावधीत स्तन कर्करोग तपासणी शिबिर, २५ ते २७ गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिर, २२ ते २४ जुलै रोजी बोन मिनरल डेन्सिटी व हाडांची तपासणी शिबिर, २२ ते २५ जुलै रोजी नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती व कोल्हापूर येथे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता तपासणी शिबीराचे २२,३१ जुलै ते १ ऑगस्ट रोजी आयोजन केले आहे.

शासकीय दंत महाविद्यालये, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव तसेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, कागल येथे २२ ते २८ जुलै रोजी मुख कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘महा आरोग्य शिबिर’ हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख उपक्रम असून प्रत्येक अधिष्ठात्याने वैयक्तिक लक्ष देवून त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी. राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *