रत्नागिरीच्या नव्या उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव

Gramin Varta
225 Views

रत्नागिरी: रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील आठ परिवीक्षाधीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश गृह विभागाकडून मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले. यामध्ये अरांक्षा यादव यांचा समावेश आहे.

रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अरांक्षा यादव यांची नियुक्ती झाली आहे. माईनकर यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर रत्नागिरी उपविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

अरांक्षा यादव या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये देशात २०२ वा क्रमांक मिळवला होता. मूळच्या हरियाणातील असलेल्या यादव यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

आयपीएस सेवेत सुरुवातीला त्यांना गुजरात कॅडर मिळाले होते. मात्र, २०२१ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे कॅडर महाराष्ट्रात करण्यात आले. कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला त्यांनी विशेष प्राधान्य दिले होते. आता रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासह विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत.

Total Visitors :
4761323
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *