चिपळूण: चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव, राधाकृष्णवाडी येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते श्री. रुपेश राधेश्यामराव कदम यांना मुंबई विमानतळावर देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचे शिवसेना पक्षाच्या वतीने थेट स्वागत करण्याचा अत्यंत प्रतिष्ठेचा बहुमान मिळाला आहे. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे प्रत्यक्ष स्वागत करण्याची मिळालेली ही संधी रुपेश कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबतच संपूर्ण टेरव परिसरासाठी ऐतिहासिक आणि अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे टेरव गावच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागताचा हा अविस्मरणीय क्षण कदम यांच्या आजवरच्या सामाजिक व राजकीय कार्याची पोचपावती मानली जात असून, या कामगिरीबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून आणि सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही दखल त्यांच्या भावी वाटचालीस अधिक ऊर्जा आणि नवी प्रेरणा देणारी ठरणार असून, रुपेश कदम यांच्या आगामी सामाजिक आणि राजकीय प्रवासासाठी सर्वत्र भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.





