राजेश सावंत यांना अखेरचा निरोप; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

Gramin Varta
484 Views

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्ह्यातील लोकप्रिय आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असलेले राजेश सावंत यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्यात भाजपची संघटना गावागावात पोहोचविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.

अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “राजेश सावंत अमर राहो” अशा घोषणांनी परिसर भावूक झाला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे वरिष्ठ नेते तसेच विविध पक्षांतील अनेक नेत्यांनी राजेश सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या जाण्याने भाजपसह रत्नागिरीच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्याने एक अभ्यासू, संघटनप्रिय आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Total Visitors :
4654148
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *