चिपळूण : तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रविवारी दुपारी सोनगाव परिसरात काही रासायनिक कारखान्यांतून मोठ्या प्रमाणावर पिवळ्या रंगाचे रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अनधिकृत प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. वारंवार होणाऱ्या या प्रदूषणामुळे नदीतील मत्स्यसंपत्ती नष्ट होत असून, मानवी आरोग्य आणि पर्यावरणासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीचे समन्वयक भरत लब्धे आणि तुळशीराम पवार यांनी सोनगाव येथे भेट देऊन पाहणी केली आणि दूषित पाण्याचे नमुने गोळा केले. यावेळी सोनगावच्या सरपंच भारती पडवळ, मच्छीमार नेते दिलीप दिवेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भरत लब्ध्ये यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) चिपळूण येथील प्रादेशिक अधिकारी कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि पुरावा म्हणून घटनास्थळाचा व्हिडिओही सादर केला. एमपीसीबी प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दोषी कंपन्यांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या परिसराची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर यापुढेही अशा प्रकारची पर्यावरणाची हानी सुरूच राहिली, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
