चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉ. उदय निरगुडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व विषद करताना, माणूस हाच देशाची खरी संपत्ती असल्याचे सांगितले. नैसर्गिक साधनसंपत्तीपेक्षा शैक्षणिक संधींतून समृद्ध होणारा नागरिकच देशाला प्रगतीपथावर नेतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिक्षण हे केवळ एक व्यावसायिक साधन नसून ते एक समर्पित व्रत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोकणची भूमी ही बौद्धिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ज्ञानाची ओढ हीच शिक्षण व्यवस्थेचा कणा असल्याचेही ते म्हणाले.
या समारंभात संस्थेचे अध्यक्ष श्रीधर भिडे यांनी शिक्षणप्रेमींच्या कार्याचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली, तर प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी महाविद्यालयाला मिळालेल्या स्वायत्ततेचा दर्जा आणि शैक्षणिक क्षेत्रातील यशाचा आढावा घेतला. या सोहळ्यात जागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कु. तन्वी रेडीज आणि बारावीच्या परीक्षेत चमकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश केशव जोशी, राजू भागवत, सुनील भागवत, मंगेश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. विनायक बांद्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव अतुल चितळे यांनी आभार मानले. शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
