गुहागर: गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर पुलाजवळील धोकादायक गतिरोधकामुळे वारंवार अपघात घडत असून हा गतिरोधक आता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र आहे आणि एका महिन्याच्या कालावधीत येथे दोन गंभीर अपघात घडले असून, एका घटनेत एका वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या महिलेवर लाखो रुपयांचा उपचार खर्च करावा लागला आहे. दि. १३ जुलै सोमवारी रात्री धोपावे कुळेवाडी येथील स्वयंम सुरेंद्र कुळे (वय १) याला ताप आल्याने शृंगारतळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्यानंतर कुटुंबीय रिक्षाने गुहागरकडे निघाले होते, मात्र रात्री सुमारे आठच्या सुमारास मोडकाआगर पुलावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने रिक्षा उलटली.
या अपघातात रमिला रमेश कुळे व कविता किशोर माने या दोघी जखमी झाल्या, तर स्वयंम कुळे या बालकाचा मृत्यू झाला, मात्र त्याचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यापूर्वीच झाला होता याबाबत पोलिस तपास सुरू आहे. यापूर्वी दि. १ जून रोजी याच ठिकाणी पर्यटनासाठी गुहागर येथे आलेल्या वर्षा राजन मठकर (रा. कांदिवली, मुंबई) या दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या आणि या अपघातात त्यांच्या बरगड्या तुटल्या तसेच खांद्याचे हाड मोडल्यामुळे उपचारासाठी सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचा खर्च करावा लागला. प्रवाशांच्या मते, या गतिरोधकावर पांढऱ्या परावर्तित पट्ट्या नसल्याने वाहनचालकांना तो स्पष्ट दिसत नाही आणि तसेच गतिरोधकानंतर लगेच सखल उतार असल्यामुळे वाहनाचा तोल जातो व अपघाताची शक्यता वाढते, ज्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहेत आणि काही अपघातांची नोंद होते तर अनेक किरकोळ अपघात अधिकृत नोंदीपर्यंत पोहोचत नाहीत.
या पार्श्वभूमीवर सखल उतारापासून किमान काही मीटर अंतरावर वाहनांचा वेग टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी चार ते पाच रंबल स्ट्रिप्स अथवा गतिरोधक उभारावेत, विद्यमान गतिरोधकावर परावर्तित पांढरे पट्टे मारावेत तसेच धोक्याचे इशारा फलक आणि फ्लॅशिंग सिग्नल बसवावेत, अशी मागणी होत असून वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.






