लांजा: लांजा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या संथ गतीने सुरू असून, पावसाच्या सरींमुळे बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या दिवशीच ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी वर्गाची मोठी गैरसोय झाली.
महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे परिसरात पावसाचे पाणी साचले असून, संपूर्ण बाजारपेठ चिखलमय झाली आहे. यामुळे तालुक्यातून आलेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना खरेदी-विक्री करताना तारेवरची कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल झाले आहेत. भाजी मार्केट परिसरात साचलेल्या चिखलामुळे ग्राहकांचा ओघ रोखला गेल्याने व्यापाऱ्यांनाही मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच पावसाळ्यात चिखल व साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
