“महावितरणचे वीजबील भरणार नाही; वसुलीसाठी आलात तर हाकलून लावू” : नगरसेवक रफिक (गुल्ल्या) नेवरेकर यांचा आक्रमक पवित्रा

Gramin Varta
531 Views

लांजा / वार्ताहर : लांजा शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले असतानाही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचा गंभीर आरोप लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती रफिक (गुल्ल्या) नेवरेकर यांनी केला आहे. अधिकारी फोन उचलत नाहीत, उचललाच तर उद्धट भाषेत बोलतात. त्यामुळे अशा निष्क्रिय प्रशासनाविरोधात आता नागरिकांच्या वतीने थेट संघर्ष उभारणार असून, यापुढे वीजबील भरणार नाही आणि वसुलीसाठी येणाऱ्यांना हाकलून लावू, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

रफिक नेवरेकर पुढे म्हणाले की, शहरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नगरपंचायतीचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होत आहे. याचा संताप नागरिक नगरपंचायतीवर काढतात. मात्र, या गंभीर समस्येबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही ते फोन उचलत नाहीत. अनेकदा फोन उचलल्यानंतरही जबाबदारी स्वीकारण्याऐवजी उडवाउडवीची आणि उर्मट भाषा वापरली जाते, असा आरोप त्यांनी केला.

लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधतो. मात्र, नागरिकांना दिलासा देण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचारीच दादागिरीची भाषा वापरत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी महावितरणच्या एका वायरमनवर गंभीर आरोप करत आम्ही काम करणार नाही… तुम्हाला जे करायचे ते करा.. अशा शब्दांत संबंधित वायरमनने उद्धट उत्तर दिल्याचा दावा केला. या संपूर्ण संभाषणाचे ध्वनिमुद्रण आपल्या मोबाईलमध्ये असून, योग्य वेळी तो पुरावा सार्वजनिक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित वायरमनला आमदार किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांच्या समोर उभे करून त्याच्या वर्तनाचा जाब विचारणार आहे. नागरिकांची कामे न करता लोकप्रतिनिधींचाच अपमान करणाऱ्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक इशाराही नेवरेकर यांनी दिला.

लांजा शहरातील सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, त्यामुळे विस्कळीत होणारी पाणीपुरवठा व्यवस्था आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांवर होत असलेले दुर्लक्षाचे आरोप यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. नगरसेवक रफिक (गुल्ल्या) नेवरेकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण प्रशासन याची कितपत गंभीर दखल घेते, याकडे आता संपूर्ण लांजावासियांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *