रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे येथील गावडेआंबे खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका प्रौढाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संदीप प्रभाकर गुरव (वय ४६, रा. मावळंगे गुरववाडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
संदीप गुरव हे मंगळवारी, १४ जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खेकडे पकडण्यासाठी खाडी किनारी गेले होते. ते वेळेत परत न आल्यामुळे स्वप्निल प्रभाकर गुरव यांनी पूर्णगड सागरी पोलीस स्थानकात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर १५ जुलै रोजी सकाळी पूर्णगड सागरी पोलीस पथकाने गावडेआंबे खाडीत बोटीद्वारे शोध घेतला. शोध मोहिमेदरम्यान सकाळी दहाच्या सुमारास संदीप गुरव यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. ग्रामस्थांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संदीप गुरव हे शेती आणि मासेमारी व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
