राजापूर/ तुषार पाचलकर : तालुक्यातील कळसवली गावातून ८८ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, पार्वती शिवराम तळेकर असे या हरवलेल्या महिलेचे नाव आहे. १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या राहत्या घरातून कुणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या आणि अद्याप परतलेल्या नाहीत.वाढत्या वयामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते.
त्या लोकांची ओळख पटवू शकत नव्हत्या. यापूर्वीही त्या दोन ते तीन वेळा घरातून निघून गेल्या होत्या, मात्र त्यावेळी त्या सुखरूप सापडल्या होत्या. १७ जुलै रोजी दुपारी जेवण केल्यानंतर त्यांनी पुन्हा घराबाहेर पडण्याचा मार्ग धरला. नातेवाईकांकडे तसेच वाडी परिसरात त्यांचा कसून शोध घेण्यात आला, परंतु त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. अखेर या प्रकरणी १९ जुलै २०२६ रोजी राजापूर पोलीस ठाण्यात नापत्ता नोंद करण्यात आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पार्वती तळेकर यांच्या अंगावरील वर्णनानुसार, त्यांचे केस पांढरे असून ते सुट्टे आहेत, रंग सावळा, नाक लांब सरळ आणि शरीरयष्टी सडपातळ आहे. त्या अंगाने लाल रंगाची मॅक्सी परिधान करून असून त्यावर पांढऱ्या रंगाची फुले आहेत. त्यांना चहा पिण्याची आणि पान-सुपारी खाण्याची सवय आहे. कपाळावर लाल रंगाची पिंजर, हातात हिरव्या रंगाच्या दोन बांगड्या, पायात जोडवी आणि गळ्यात पिवळ्या रंगाचे धातूचे खोटे मंगळसूत्र त्यांनी घातले आहे.
त्यांच्यासोबत कोणतीही वस्तू किंवा कागदपत्रे नाहीत. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास राजापूर पोलीस ठाेशी किंवा नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






