नवी दिल्ली : पासपोर्ट हे नागरिकत्व सिद्ध करणारे अधिकृत दस्तऐवज नसून ते केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकारने जारी केलेले एक प्रवास दस्तऐवज आहे, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. १४ व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पासपोर्ट केवळ परदेश प्रवासाची सोय आणि ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो, परंतु तो भारतीय नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानला जाऊ शकत नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जरी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनाच पासपोर्ट दिला जात असला, तरी तांत्रिकदृष्ट्या तो नागरिकत्वाचा कायदेशीर दाखला नाही.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सेवा नेटवर्कमधील प्रगतीचाही आढावा घेतला आहे. गेल्या काही वर्षांत पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या ७७ वरून ५४५ पर्यंत वाढल्याने सेवेत मोठी सुधारणा झाली आहे. आता पोलीस पडताळणी वगळता अवघ्या सहा कामकाजाच्या दिवसांत पासपोर्ट जारी केला जात असून, पासपोर्ट सेवा केंद्रांवरील प्रतीक्षा कालावधीही सरासरी ४५ मिनिटांपेक्षा कमी झाला आहे. २०२५ सालात मंत्रालयाने १५ दशलक्षाहून अधिक पासपोर्ट सेवा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. पासपोर्ट हा भारत सरकारची मालमत्ता असून तो वेळेवर परत करणे बंधनकारक असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
