चिपळूण (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान, चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर झालेल्या एका दुचाकी अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले. ताफा थांबवून त्यांनी केलेल्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ना. राणे यांचा ताफा बायपासवरून जात असताना एक दुचाकीस्वार रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला होता. हा अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता ताफा थांबवण्याचे निर्देश दिले आणि स्वतः मदतीसाठी धावले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून त्वरित रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमी व्यक्तीला त्वरीत रुग्णालयात हलवून त्याच्यावर योग्य उपचार सुरू होतील, याची त्यांनी खात्री केली.
एका जबाबदार मंत्री म्हणून ना. राणे यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि संकटकाळी केलेल्या मदतीमुळे त्यांच्यातील माणूसकीची भावना अधोरेखित झाली आहे. अनेकदा अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र ना. राणे यांनी आपल्या तातडीच्या दौऱ्यातही माणुसकीला प्राधान्य देत, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य निभावले आहे. त्यांच्या या कृतीमुळे सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.






