तुषार पाचलकर / राजापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज सकाळी साडे अकराच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
सततच्या पावसामुळे अनुस्कुरा घाट धोकादायक बनला होता. आज सकाळी अचानक घाटातील एका वळणावर माती आणि दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहनांच्या रांगा लागल्या. याच मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला. तसेच, बांधकाम विभागाला तातडीने कळवून दरड हटवण्यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रणा पाठवण्याची विनंती केली.
पोलिसांच्या मध्यस्थीने आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास दरड हटवण्याच्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदतकार्य सुरू करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पुढील काळात पावसाचा अंदाज लक्षात घेता, अनुस्कुरा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, पर्यायी मार्गांचा वापर शक्य असल्यास तो करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.