रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ज्ञ आणि शहरातील प्रसिद्ध स्वस्तिक तसेच चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अनुभवी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. डॉ. सुनिता चव्हाण यांनी आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय कारकिर्दीत हजारो माता आणि बालकांना आरोग्य सेवा पुरवून सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले होते.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे निवासस्थान ‘स्वस्तिक बंगला’, माळनाका येथे दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा निवासस्थानापासून चर्मालय स्मशानभूमीकडे निघणार असून तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात डॉ. नितीन रमेश चव्हाण आणि संपूर्ण चव्हाण परिवार शोकाकुल असून, रत्नागिरीतील विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.




