स्थानिक तरुणांच्या धाडसाने टळली दुर्घटना
रत्नागिरी : भाटये समुद्रकिनारी रविवारी दुपारी समुद्रस्नानासाठी उतरलेल्या सोलापूर येथील दोघांचा जीव स्थानिक तरुणांच्या तात्काळ मदतीमुळे थोडक्यात बचावला. दुपारी सुमारास घडलेल्या या प्रसंगामुळे समुद्रकिनारी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोलापूरच्या शेळगी परिसरात राहणारे तेजा तमन्ना मेत्रे (23) आणि ऋषिकेश राजेश कोळी (23) हे दोघे 23 नोव्हेंबर रोजी भाटये किनाऱ्यावर समुद्रस्नानासाठी आले होते. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक लाटांच्या प्रवाहात अडकले आणि हातपाय गाळू लागले.
किनाऱ्यावरून हा प्रसंग पाहिल्यानंतर गावातील तरुण तात्काळ मदतीसाठी धावत गेले. सर्वांनी मिळून जीवाची पर्वा न करता दोघांना वाचवले. धाडसी प्रयत्नांमुळे दोन्ही युवकांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश आले. योग्य वेळी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
भाटये समुद्रात बुडणाऱ्या सोलापुरातील दोघांना वाचवले






