GRAMIN SEARCH BANNER

खुशखबर! चाकरमान्यांना बाप्पा पावला, मुंबई- मालवण साडेचार तासांत

Gramin Varta
22 Views

मुंबई: यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोकणवासीयांना मोठी भेट देणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

मंत्री राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लवकर सागरी प्रवासाचा पर्याय खुला होणार आहे. मुंबई ते रत्नागिरी तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग M2M फेरी लवकरच सुरू होणार आहेत. यामध्ये एकावेळी ५०० प्रवाशांसह १५० गाड्या वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. तसेच मुंबई ते विजयदुर्ग प्रवास अवघ्या ४.५ तासात तर मुंबई ते रत्नागिरी अवघ्या तीन तासात करता येणार” असल्याचेही ते म्हणाले.

चाकरमान्यांचा प्रवास होणार आणखी सुकर

गणेशत्सावासाठी गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणेशोत्सवात समुद्र मार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर अवघ्या तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे.

हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम बोटीने होणार चाकरमान्यांचा प्रवास

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच महामार्गाची अर्धवट कामे याचा विचार करता जलमार्गाने गणपतीला गावी जाणे सोयीस्कर ठरणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार, अशी मोठी घोषणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार असल्याचे ही आता पुढे आले आहे. त्यामुळे चाकरमन्यांसाठी ही आनंदाची बातमी असून दरवर्षी होणाऱ्या प्रवासासंदर्भातील त्रासापासून काही अंशी सुटका होणार आहे.

मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास होणार सुरू

गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवास. हा त्रास नेहमीचाच झाला आहे. आता या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.

Total Visitor Counter

3199496
Share This Article