राजापूर/ तुषार पाचलकर: तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, आज मंगळवार दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून धरणाच्या सांडव्यावरून २.४१ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची पाणीपातळी १७७.०५ मीटर पोहोचली असून, प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा ७२.५६ दलघमी म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरला आहे.
आजच्या दिवसात ७४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, १ जून २०२६ पासून आतापर्यंत एकूण पर्जन्यमान २००१ मिमी झाले आहे, तर सध्या विमोचक विसर्ग शून्य ठेवण्यात आला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण व त्याच्या अनुषंगिक भागात नागरिकांचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग लांजाचे उपअभियंता अमोल एकनाथ बनसोडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्र, नाले तसेच धरणाच्या परिसरात कुणीही जाऊ नये आणि स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.





