राजापूर : राजापूर अर्बन बँकेवर सत्तेत असलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या ठरवून दिलेल्या धोरणानुसार कार्यकाळ पूर्ण झाल्याने बँकेचे अध्यक्ष संजय ओगले आणि उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या राजीनाम्यांवर निर्णय घेतला जाणार असून पुढील एक वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे निश्चित केली जाणार आहेत. राजापूर अर्बन बँकेवर सर्वपक्षीय सहकार पॅनेलची पूर्ण बहुमताने सत्ता असून, सर्व संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठी प्रारंभापासूनच या दोन्ही पदांचा कार्यकाळ एक वर्षाचा ठेवण्यात आला आहे.
या धोरणानुसार पहिल्या वर्षी अध्यक्षपद संचालक हनिफ मुसा काझी यांनी भूषविले होते, तर दुसऱ्या वर्षी अनामिका जाधव यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. तिसऱ्या वर्षी संजय ओगले हे अध्यक्षपदी, तर विजय पाध्ये हे उपाध्यक्षपदी कार्यरत होते. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
आता पुढील एक वर्षासाठी अध्यक्षपदासाठी अॅड. शशिकांत सुतार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, उपाध्यक्षपदासाठीही नाव निश्चित केले जाणार आहे. सोमवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनाम्यांना मंजुरी देऊन ते सहकार विभागाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे





