रत्नागिरी: कोकणातील ५ जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत जवळपास २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी सरकारने २९ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर केले आहे.पुढील काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
राज्य सरकारने रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी रब्बीचे अनुदान वाटपास मंजुरी दिली. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत १० हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले होते. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी २६ लाख, सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी जवळपास १५ लाख, ठाणे जिल्ह्यासाठी ९.४८ कोटी आणि पालघर जिल्ह्यासाठी १३.७४ कोटी रुपये अनुदान वाटपास मंजुरी दिली आहे.
रायगड जिल्हा
रायगड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात २० हजार शेतकऱ्यांच्या ६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या क्षेत्रासाठी सरकारने ६ कोटी २ लाख रुपयांचे अनुदान वाटपास मंजुरी दिली आहे.
पालघर जिल्हा
पालघर जिल्ह्यात १३ हजार ७४४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी ४९ हजार शेतकऱ्यांना १३ कोटी ७४ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
ठाणे जिल्हा
ठाणे जिल्ह्यात ९ हजार ४८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ९ कोटी ४८ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान ३५ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यात २३३४ शेतकऱ्यांच्या पिकांचे २६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना २६ लाख ७० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
सिंधुदूर्ग जिल्हा
सिंधुदूर्ग जिल्हात ८५२ शेतकऱ्यांच्या १५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसाग्रस्त क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना १५ लाख ९० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना २९ कोटींचे रब्बी अनुदान मिळणार







