रत्नागिरी : जयगड किनारपट्टीवर मासेमारीसाठी गेलेल्या मिरकरवाडा येथील खलाशी रोहित जंगबहाद्दूर चौधरी (४७) यांचा समुद्रात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक मच्छीमार समाजात या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित चौधरी हे नेहमीप्रमाणे सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी १२ नोव्हेंबर रोजी जयगड समुद्रभागात गेले होते. पुढील दिवशी पहाटे बोट मिरकरवाडा जेटीकडे परत येत असताना रोहित हे बोटीवर गाढ झोपलेल्या अवस्थेत आढळले. सहकाऱ्यांनी कितीही हाक मारूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शंका निर्माण झाली.
त्वरित त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेने मच्छीमार वसाहतीत दुःखाची छाया पसरली असून सहकाऱ्यांनी रोहित हे कष्टाळू आणि शांत स्वभावाचे असल्याचे सांगितले. पोलिस तपासानंतर मृत्यूमागील कारणे उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी : जयगड येथे मच्छीमार खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू






