GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत जमिनीच्या व्यवहारात मोठी फसवणूक: खोटे दस्तऐवज बनवून १२ लाखांना गंडा

Gramin Varta
358 Views

रत्नागिरी: रत्नागिरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात खोटे दस्तऐवज तयार करून एका सेवानिवृत्त व्यक्तीची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार ११ डिसेंबर २०२३ ते १६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला असून, याबाबत १६ नोव्हेंबर २०२५ रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश हनमंत कांदळकर (वय ५८, सेवानिवृत्त, रा. कर्ता टर्मिनस जवळ, चेंबूर, मुंबई, (कुलमुखत्यार आदित्य राजेश कांदळकर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फसवणूक झालेली जमीन कसोप येथील सर्व्हे क्रमांक १३७/१६ मधील ९ गुंठे इतकी होती, जी प्रसाद समंत साळवी, सुहासिनी सुमंत साळवी आणि स्मिता सुमंत साळवी यांच्या मालकीची होती. आरोपी मनोज लक्ष्मण जाधव (रा. नाचणे रोड, रत्नागिरी) याच्याकडे या जमिनीचे मुखत्यारी हक्क होते.

आरोपी मनोज जाधव याने जमिनीची विक्री करून देण्यासाठी फिर्यादींकडून एकूण १२,००,००० रुपये (बारा लाख रुपये) स्वीकारले. मात्र, ही रक्कम घेतल्यानंतर त्याने सदर सर्व्हे क्रमांक १३७/१६ मधील ९ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार केले. या खोट्या दस्तऐवजांच्या आधारे त्याने दुय्यम निबंधक कार्यालय, रत्नागिरी येथे खरेदीखत तयार करून फिर्यादींची फसवणूक केली.

फिर्यादींची कायदेशीर तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पोलिसांनी अर्ज चौकशीअंती या विलंबाने दाखल झालेल्या गुन्ह्याची नोंद घेतली आहे. आरोपी मनोज लक्ष्मण जाधव याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३) आणि ३४०(२) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास रत्नागिरी पोलीस करत असून, या फसवणुकीच्या प्रकारामुळे मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांमध्ये सतर्कता निर्माण झाली आहे.

Total Visitor Counter

3072266
Share This Article