पारदर्शक कारभारासाठी नागरिकांची कमिटी स्थापन करणार; भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आश्वासन
देवरुख (प्रतिनिधी) : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गाव विकास समिती’ आणि ‘आम आदमी पार्टी’ युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. दीक्षा रवींद्र खंडागळे यांनी शहराच्या कारभारात ऐतिहासिक बदल करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी थेट ‘पारदर्शक कारभाराची गॅरंटी’ देत, नगरपंचायतीच्या कामकाजावर थेट लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष ‘नागरिकांची कमिटी’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
या प्रस्तावित कमिटीची रचना आणि उद्दिष्ट्ये स्पष्ट करताना सौ. खंडागळे यांनी सांगितले की या समितीवर केवळ क्षेत्रातील अनुभवी, ज्ञानी आणि गैर-राजकीय नागरिकांची नियुक्ती केली जाईल.
ही समिती सामान्य नागरिक आणि नगरपंचायत प्रशासन यांच्यात दुवा म्हणून काम करेल, ज्यामुळे प्रशासनाचे निर्णय अधिक जनता केंद्रित होतील.
या कमिटीच्या माध्यमातून नगरपंचायतीचा कारभार पूर्णपणे पारदर्शक होईल आणि शहरातील विकासकामांमध्ये जनतेचा थेट सहभाग सुनिश्चित केला जाईल.
नागरिकांची कमिटी नगरपंचायतीच्या कारभारावर काटेकोरपणे लक्ष ठेवेल, ज्यामुळे शहरातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराला निश्चितपणे आळा बसेल आणि शहर-कारभार स्वच्छ होईल.
सौ. दीक्षा रवींद्र खंडागळे यांनी यावेळी बोलताना, युतीला विजयी केल्यास शहराला पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि जबाबदार प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी ‘गाव विकास समिती’ आणि आप युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
गाव विकास समितीने नगराध्यक्ष हा खऱ्या अर्थाने देवरुख शहराचा विकास करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवला असून सामान्य लोकांचा विकास, पारदर्शक कारभार हाच आमचा ध्यास असल्याचे यावर बोलताना गाव विकास समितीचे निवडणूक प्रभारी डॉ मंगेश कांगणे यांनी सांगितले.







